![](https://www.navgannews.in/wp-content/uploads/2024/02/Screenshot_20240207_071312-1.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेत समर्थकांसह सत्ताधारी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला होता.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘दादा’ व ‘साहेब’ असे दोन गट पडले होते. दोन्ही गट पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह अर्थात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ व ‘घड्याळ’ यावर दावा सांगत होते. हा लढा निवडणूक आयोगात जाऊन पोहोचला होता.
निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर आज याबाबतचा निर्णय देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले आहे. हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा दिलासा तर शरद पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदृश्य शक्तीचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी भाजपकडे बोट केले आहे.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणालाही विचारले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा तर ते शरद पवार यांचेच नाव सांगतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. निकालाचे आश्चर्य वाटले नाही, जो निर्णय शिवसेनेबाबत देण्यात आला तोच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसबाबत देण्यात आला आहे. या निर्णयाबाबत आश्चर्य वाटत नाही असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.
निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप | Supriya Sule on NCP ECI Verdict
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा राजकीय असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी त्यांनी अदृश्य शक्तीचा उल्लेख करत भाजपकडे बोट दाखवले. शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील असेच आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयात जाणार | Supriya Sule on NCP ECI Verdict
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांचे समर्थक जयंत पाटील यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. पक्ष असो नसो आपण शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.