![](https://www.navgannews.in/wp-content/uploads/2023/08/IMG_20230822_085800.jpg)
पिंपरी शहराच्या मध्यातून वाहणार्या पवना नदीच्या पात्रात पुन्हा फेस आल्याचा प्रकार सोमवारी (दि. 21) सकाळी निदर्शनास आला. नाल्याद्वारे किंवा नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचा संशय प्रशासनाला आहे.नदीप्रदूषण करणार्या कंपन्या व उद्योगांचा शोध महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून घेण्यात येत आहे.पवना नदीवरील थेरगाव येथील केजूबाई बंधार्याजवळ आज सकाळी नदी प्रदूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाच्या पथकाने नदीची पाहणी केली. परंतु, हे प्रदूषण कशामुळे झाले, हे समजले नाही.
नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याची शक्यता आहे. हे सांडपाणी कोणती कंपनी किंवा उद्योगांकडून सोडण्यात आले, याचा शोध घेण्यात येत आहे. नदी प्रदूषणात जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
लाँड्री सील करूनही पुन्हा फेस?
रुग्णालयांतील रुग्णांचे व इतर कपडे वाल्हेकरवाडी-चिंचवड येथील विघ्नहर्ता क्लीअरन्स लाँड्री अँड ड्रायक्लीनर्स या व्यावसायिक लाँड्रीत धुतले जात होते. कपडे धुतल्यानंतर शिल्लक सांडपाणी थेट पवना नदीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला होता. हा प्रकार 16 जुलैला उघडीस आला होता. त्यासंदर्भात महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शोध घेतल्यानंतर त्या विनापरवाना लाँड्रीचा शोध लागला होता. ती लाँड्री सील करून त्या व्यावसायिकावर पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही कारवाई 24 जुलैला करण्यात आली. आता पुन्हा असा प्रकार निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकारची इतरत्र लाँड्री सुरू असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
महापालिकेकडून दिखाऊ कारवाई
काही कंपन्या व उद्योगांचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आहे. अनेक नाले थेट नदीत मिसळत आहेत. या कारणांमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदायिनी असणारी पवना नदी प्रदूषित झाली आहे. असे असताना महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करते. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी पवनानदी दूषित करणार्यांवर कडक कारवाई कधी करणार? दूषित पाणी प्यायल्याने नागरिक दगावण्याची अथवा मोठी घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असा प्रश्न माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
कांदा निर्यात शुल्कवाढीचा निर्णय शेतकरी हिताचा: डॉ. भारती पवार