अजगराची दहशत,एक-एक करता गावातील तब्बल नऊ बकऱ्या फस्त


चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावात गेल्या वर्षभरापासून अजगराची दहशत होती. अनेकांना गावालगत शेतशिवरात एक महाकाय अजगर सतत दिसायचा. या अजगराने एक-एक करता गावातील तब्बल नऊ बकऱ्या फस्त केल्या.
बारा फुटी अजगराला पकडण्यात अखेर यश आले आहे.

उचली गावाशेजारील शेतशिवारात अजगरचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे. लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. शनिवार, आठ ऑक्टोबर रोजी सौ. मिनाक्षी ढोंगे यांची बकरी अजगराने गिळली. याबाबतची माहिती अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज वठे यांना देण्यात आली. माहिती मिळताच सर्पमित्र ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र अंधार व नाल्याची बाजू असल्याने अजगराला पकडण्यात अडचण येत होती. तरीसुद्धा मोठ्या शिताफीने अजगारास पडण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

हा अजगर बारा फूट लांबीचा आहे. या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी सेमस्कर, वनरक्षक संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्तस्थळी सोडून देण्यात आले. या बचावकार्यात क्रिष्णा धोटे व गावाचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here