ताज्या बातम्यामहत्वाचे

‘जंगलाचा राजा सिंहच असतो, २०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार’; CM शिंदेंचं विधान


नवी दिल्ली: श्रीनगर येथे ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील ७३ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना ‘वन इंडिया रिंग’ने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मीर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध होते, याचा एकनाथ शिंदेंनी आवर्जून उल्लेख केला.

‘सरहद’ संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली. तसेच श्रीनगर येथील मराठी नागरिकांशी संवाद साधल्यावर, ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हीच छत्रपती शिवरायांची शिकवण अंगिकारून आपले मराठी बांधव दोन राज्यात परस्पर मंत्री आणि सहकार्याचा अभेद्य सेतू उभारतील याची मनोमन खात्री पटल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

२०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार-

श्रीनगर दौऱ्यावर असताना एनकाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. यावेळी २०२४मध्ये देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. सर्व विरोधक विचार करताय की, नरेंद्र मोदींना कसे हरवता येईल. तसेच जंगलातील बकऱ्यांसह अन्य प्राणी एकत्र आले तरी सिंहासोबत लढता येत नाही, कारण सिंह हा सिंह असतो आणि जंगलात त्याचच चालतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार होतं, आता अजित पवार देखील आमच्यासोबत सामील झाले आहेत. आधी इगो वाल्याचं सरकार होतं. त्यावेळी अनेक प्रकल्प रखडलेली होती. परंतु आम्ही सत्तेत येताच सर्व कामे सुरु केली, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *