ताज्या बातम्या

उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती


उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. उस्मानाबादचा इतिहास रामायण काळापासून आढळतो. वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगतात. उस्मानाबादला मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट यांचे राज्य होते तसेच यादवांचे देखील राज्य होते.तर चला मग पाहूया या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.

उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती

उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा  निझाम मीर उस्मान अली खान याच्या नावावरून पडले. उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला उस्मानाबाद जिल्हा नळदुर्ग सारख्या किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट असुन बराचसा भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापला आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

उस्मानाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,272 चौ. किमी असून याच्या उत्तरेस बीड व परभणी, पूर्वेस नांदेड व कर्नाटक राज्याचा बीदर, दक्षिणेला सोलापूर आणि पश्चिमेला अहमदनगर व सोलापूर हे जिल्हे आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके :

उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील तालुके आहे. अहमदपूर, परांडा, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर, कळंब, उदगीर, औसा, उमरगा, निलंगा हे तालुके व भूम हा महाल असे जिल्ह्याचे विभाग आहेत. 1950 मध्ये तालुक्यांची पुनर्रचना करण्यात आली.  1956 च्या राज्यपुनर्रचनेमध्ये बीदर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व उदगीर हे तालुके उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट केले गेले.

उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास :

तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परंडा येथील भूईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग  किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून, येथील जलमहाल हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.

नळदुर्ग जवळ  अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगाव येथील कल्याणस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर तसेच शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे.

शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर ‘धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. उस्मानाबादचा इतिहास रामायण काळापासून आढळतो. वनवासात असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव केल्याचे सांगतात.

उस्मानाबाद शहरानजीक पापनाश येथे सीतेची नहाणी आहे. या परिसरात केवड्याची झाडे आहेत. त्यापूर्वी उस्मानाबाद मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते. त्यानंतर उस्मानाबाद बहामणी आणि विजापूर संस्थानात अाले. 1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते.

हवामान :

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे हवा कोरडी व सौम्य आहे.  पठारी प्रदेशातील तालुक्यांचे हवामान दक्षिणेकडील सपाट प्रदेशातील तालुक्यांपेक्षा अधिक थंड व दमट असते. परांडा व भूम महाल या घाटापलीकडील प्रदेशात पाऊस 60 सेंमी.

उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमध्ये 90 सेंमी. औसा, उमरगा व निलंगा तालुक्यांत 80 सेंमी. आणि कळंब तालुक्यात 70 सेंमी. पडतो. कमी पावसामुळे परांडा व भूम महाल या भागांत दहा वर्षांतून एकदा तरी दुष्कळ पडतो.

प्रमुख नद्या :

मांजरा व तेरणा या जिल्ह्यातील मुख्य नद्या आहेत. बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या इतर नद्या आहेत.

शेती :

जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग शेती असून कामकरी लौकांपैकी 80.13 टक्के लोक शेती व्यवसायात आहेत. ओलिताखालील 5.5% होते. ओलितापैकी 89.62% क्षेत्र विहिरीच्या पाण्याखाली होते. खरीप व रब्बी यांच्या पिकांखालील क्षेत्राचे प्रमाण 63:37 इतके होते.

भूम महाल, परांडा व तुळजापूर तालुक्यांत पिके अधिक होतात. ज्वारी, कापूस, ऊस, भूईमूग, तूर, मूग, गहू, हरभरा, अळशी ही येथील मुख्य पिके असून भात, मका, बाजरी, इतर कडधान्ये व गळिताची धान्ये, तंबाखू, मसाल्याची पिके व फळे आणि भाजीपाला यांचेही उत्पादन होते.

समाज जीवन :

उस्मानाबाद या जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार 16,60,311 असून लोकसंख्येची घनता 221 प्रति चौरस किमी आहे. साक्षरतेचा दर 76.33% असून उस्मानाबादमध्ये 1000 पुरुषांमागे 920 स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते.

जिल्ह्यात वंजारी, गुजराती, हिंदी, कैकाडी, पारधी, तेलुगू ह्या भाषा बोलल्या जातात. 83.17 % लोक हिंदुधर्मीय असून 10.11% मुसलमान व 6.23 % बौद्धधर्मीय आहेत. जिल्ह्यातील डोंगराळ भागात परधान, भिल्ल, गोंड, कोलम, आंघ, कोया या अनुसूचित जमाती राहतात.

वाहतूक व्यवस्था :

उस्मानाबाद शहर राष्ट्रीय महामार्ग 52 वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग  संगरूर(पंजाब) हिस्सार (हरियाणा) कोटा-इंदूर-धुळे-औरंगाबाद- बीड-उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर-विजयपूर- हुबळी-अंकोला (कर्नाटक)असा जातो. उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे.

उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *