ताज्या बातम्या

हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने तीन म्हशींना उडवले


मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मार्गावर नुकत्याच पंतप्रधानांच्या हस्ते सुरू केलेल्या सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने गुरुवारी सकाळी अहमदाबादजवळील वटवा आणि मणिनगरदरम्यान तीन म्हशींना उडविल्याची घटना घडली.
अपघातात वंदे भारतचे एअरो डायनामिक आकाराचे फायबरचे बोनेट तुटल्याने ही गाडी दहा मिनिटे उशिराने रवाना झाली. मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे मुंबई ते अहमदाबाद-गांधीनगर रेल्वे मार्गावर तारांचे कुंपण बसविण्यात येणार आहे.

पहिली वंदे भारत 2019 मध्ये दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावली तेव्हा तिलाही मोकाट गुरांचा सामना करावा लागला होता. या ट्रेनच्या मोटरमनच्या कॅबपुढे एअरो डायनामिक आकाराचे फायबरचे बोनेट बसविले आहे. जर गुरांचा कळप आडवा आला तर हे फायबरचे बोनेट तुटते. अशा प्रकारचे कव्हर रेडिमेड तयार असून लागलीच पर्यायी कव्हर बसवून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्गावर तारांचे कुंपण बसविण्याचे काम हाती घेतल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू असून ते ऑक्टोबर 2024 पर्यंत संपणार आहे. त्यानंतर मुंबई-ते दिल्ली प्रवास 12 तासांत करणे शक्य होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *