अंबाजोगाईताज्या बातम्याबीड जिल्हा

शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती- अमर हबीब


 

शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती- अमर हबीब
१९ मार्चला उपवास, पदयात्रा व आंबाजोगाईत किसानपुत्रांचा मेळावा

बीड : शेतकर्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत. आता पर्यंत देशात जवळपास पाच लाख शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती’ मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकरी आत्महत्या हा पुढे ढकलण्या सारखा विषय नाही. इतर सगळी कामे बाजूला ठेवून ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय सरकारांने अग्रक्रमाने विचारात घेतला पाहिजे. अशी किसानपुत्र आंदोलनाची मागणी आहे.

शेतकरीविरोधी कायदे

शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले खून आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी केले आहेर व वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करीत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात हस्तक्षेप करणारे आहेत. घटना विरोधी आहेत. ते टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले पण पहिली घटना दुरुस्ती करून टाकलेले ९वे परिशिष्ट हे होय. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट ९ मध्ये आज २८४ कायदे आहेत त्यापैकी २५० कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळे ते टिकून राहिले आहेत.
शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. म्हणून शेतकर्यांना या कायद्यातून सोडवणे महत्वाचे आहे असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

उपवास
१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्याची वीज कट करण्यात आली होती. ते वीज बिल भरू शकले नाही. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. २०१७ पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी १९ मार्च रोजी ‘अन्नत्याग आंदोलन’ केले जाते. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसान पुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक १९ मार्चला उपवास करतात. २०१७ साली साहेबराव करपे यांचे गाव चील गव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केले. २०१८ साली साहेबराव कुटुंबीयांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपूर (जि. वर्धा) जवळ पवनार आश्रम येथे उपोषण केले. पुढच्या वर्षी दिल्लीत म. गांधी समाधी परिसरात देशातील अन्य राज्यातील मित्रांसोबत उपवास केला. २०२० साली पुण्यात म. फुले वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर उपोषण केले. गेल्या वर्षी औंढा नागनाथ येथून चीलगव्हाण पर्यंत किसानपुत्रांनी पदयात्रा काढली होती. चिल गव्हाण येथे उपवासाची सांगता करण्यात आली होती.

पदयात्रा
या वर्षी आम्ही पानगाव येथून पदयात्रा काढीत आहोत. पदयात्रेत महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातून आलेले ५० किसानपुत्र भाग घेणार आहेत. १९८० साली पोलीस गोळीबारात ठार झालेल्या हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही पदयात्रा निघेल. ती फावडेवाडी, चोपनवाडी मार्गे जाऊन घाटनांदूर येथे मुक्काम करेल. १८ तारखेला ही पदयात्रा दत्तपूर मार्गे पूसला जाईल व गिरवली येथे मुक्काम करेल. गिरवली येथे महिलांचा मेळावा होईल. डॉ शैलजा बरुरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. १९ मार्च रोजी धायगुडा पिंपळा मार्गे पदयात्री अंबाजोगाईला जातील. दुपारी अडीच वाजता अंबाजोगाईच्या आंबेडकर चौकात या पदयात्रेचे स्वागत होईल. ३ वाजता श्री मुकुंदराज साभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होईल. या मेळाव्याला अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर. सुभाष कच्छवे व महाराष्ट्रातील भिन्न जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र मार्गदर्शन करतील. सुदर्शन रापतवार हे सूत्र संचालन करतील. पदयात्रेचे संयोजक सुभाष कच्छवे आहेत.

आवाहन
जो पर्यंत शेतकर्यांच्या आत्महत्या होत राहतील तोपर्यंत दर वर्षी १९ मार्च रोजी किसानपुत्र उपवास करीत राहतील. शेतकरी आत्महत्यांचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी किसानपुत्रांची ही धडपड आहे. १९ मार्च रोजी जास्तीजास्त लोकांनी उपवास करावा असे आवाहन अमर हबीब, सुभाष काच्छवे, दत्ता वालेकर, डोणे गुरुजी व शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन, अंबाजोगाई. मो. 8411909909


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *