क्राईमताज्या बातम्यापुणेबीड जिल्हाबीड शहर

बीड जिल्हयात मैत्रेय कंपनीचा 70 कोटी रुपयांचा चुना


बीड : बीड जिल्ह्यात मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड (Maitreya Private Limited) या कंपनीने शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना दाम-दुप्पट आणि मुदत ठेवीला 11 टक्के व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यावधींची माया जमा करुन धूम ठोकली आहे. या कंपनी विरोधात बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल आहे.कंपनीने फसव्या योजनेला बळी पाडून अंदाजे 40 ते 45 हजार ग्राहकांना 50 ते 70 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र 40 कोटींची रक्कम दोषारोपपत्रात फक्त चार कोटी दाखवली, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे. बीडसह महाराष्ट्रातील हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत मदतीसाठी निवेदने देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही खातेदारांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. बीड जिल्ह्यातून 2010-11 मध्ये प्रत्येक महिन्याला पाच कोटींचे कलेक्शन होत होते.

मैत्रेय फंडमध्ये बीड जिल्ह्यातील 25 ते 30 हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्ती व्याजाचे अमिष दाखवून यात कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. एकट्या बीड शहरात 40 कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांनी केली आहे, अशी माहिती पीडित गुंतवणूकदार महिलांनी दिली. आरोपींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचे फोटो, अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याचे महिलांनी सांगितलं.

आता पैसे परत मिळत नसल्याने अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असं म्हणत असताना पीडित ठेवीदार महिलांच्या डोळ्यांमध्ये अक्षरश: पाणी आलं. (Instagram देखील आता राहणार नाही फ्री! या फीचरसाठी तुम्हाला मोजावे लागणार पैसे) 2004 साली मैत्रीय प्रा. लिमिटेड कंपनीची पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली होती.

2010 साली या कंपनीने बीड शहरात ऑफिस उघडून एजंटची नेमणूक केली होती. बीड शहरातील सावित्री शिंदे, विद्या नाईक यांच्यासारख्या असंख्य महिलांनी शहरातील घर काम, शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना कंपनीबद्दल सांगून जवळपास 5 ते 7 कोटींची गुंतवणूक करून दिली आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने आता काय करायचे? असा प्रश्न या महिलांसमोर उभा राहिलाय.

लोक घरासमोर येऊन आत्महत्येची धमकी देतात, अशी माहिती सावित्री शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बीड शहरात राहणाऱ्या विद्या नाईक या महिलेचे पती मोलमजुरी करतात. विद्याताई स्वत: घरगुती मेस चालवतात.

विद्या यांना दोन मुली आहेत. त्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी एक लाख रुपये मैत्रीमध्ये गुंतवले होते. तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सांगून इतर नातेवाईकांचे देखील पाच लाख रुपये भरले होते. मात्र पैसे गोळा केल्यानंतर कंपनी बंद झाली.

त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. तर अनेक लोक रोज घरी येऊन शिव्याशाप देतात. सुख-दुःखाच्या कार्यक्रम असला तरी लोक पैशांसाठी हिणकस वागणूक देतात. पैसे न मिळाल्याने आज त्यांच्यावर घर विकायची पाळी आली आहे.

ते आज पैसे मिळतील, उद्या मिळतील याच अपेक्षेवर जगत आहेत. जर पैसे मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं विद्या नाईक यांनी सांगितलं बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मैत्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मोठं नेटवर्क होतं. बीड शहरामध्ये मोठं ऑफिसदेखील होतं. या ठिकाणाहून प्रत्येक वर्षी वीस ते पंचवीस कोटी रुपयाचे उलाढाल होत असायची.

मात्र अचानक कंपनी बंद पडल्यामुळे 40 ते 45 हजार गुंतवणूकदारांचे 50 ते 70 कोटी अडकून पडले आहेत. या फसवणुकीमुळे अनेकांनी आत्महत्या केली आहे. तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. सरकारने ताबडतोब कंपनीची मालमत्ता जप्त करुन त्यांचे पैसे द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी शिंदे यांनी केली.

मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, भविष्यासाठी गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावले आहेत. तर घरामध्ये कलह निर्माण झाले आहेत. अनेक पती-पत्नीमध्ये भांडण झाले. तर अनेक गुंतवणूकदार एजंटला येऊन मारहाण देखील करत आहेत. यामुळे या 40 ते 50 हजार गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *