प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडेवर महेंद्रसिंह धोनीने षटकार मारला अन् भारताचा 28 वर्षांचा दुष्काळ संपला. भारताने 1983 नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप उंचावला.
या घटनेला आता एक तप उलटून गेले आहे. मात्र या क्षणाची पुनरावृत्ती झालेली नाही.
2011 चा वर्ल्डकप भारतात झाला होता. त्यावेळी भारत आणि श्रीलंका हे दोन आशिया खंडातील देश फायनलमध्ये आले होते. आता 2023 चा वर्ल्डकप देखील भारतात होत आहे. त्यामुळे यंदाही आशियातील दोन संघ फायलन खेळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
श्रीलंकेचा माजी खेळाडू निरोशन डिक्वेला याच्या मते यंदाच्या वनडे वर्ल्डकपची फायनल देखील भारत आणि श्रीलंका यांच्यातच होईल.
श्रीलंकेचा क्रिकेटपटू निरोशन डिक्वेला याने आशा व्यक्त केली आहे की यंदाच्या वर्ल्डकपची फायलन देखील भारत आणि श्रीलंका यांच्यातच होईल. येत्या 5 ऑक्टोबरला भारतात वनडे वर्ल्डकपची सुरूवात होत आहे. वर्ल्डकपची सुरूवात गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना हा वानखेडेवरच 2 नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रीलंकेचा डिक्वेला म्हणाला की, ‘यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारत आणि श्रीलंका अशी फायनल होईल अशी आशा करतोय. जो कोणी प्रक्रिया, मुलभूत गोष्टी योग्य प्रकारे अंमलात आणेल, चांगलं क्रिकेट खेळेल तो जिंकेल. आम्ही आमच्यावर जास्त लक्ष देणार आहे विरोधी संघांवर नाही.’
वर्ल्डकपपूर्वी आशियातील सर्व संघ हे आशिया कपमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. ही एकप्रकारे वनडे वर्ल्डकपची रंगीत तालीमच असणार आहे. गेल्या आशिया कपमध्ये श्रीलंका फायनलमध्ये पोहचला होता. गेल्या वर्षाचा आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता.