भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच समाप्त झाला. या दौऱ्यावर कसोटी व वनडे मालिकेत विजय मिळवण्यात भारतीय संघाला यश आले. मात्र, टी20 मालिका भारतीय संघाने गमावली. या दौऱ्यावर सर्वाधिक चर्चा भारताचा फलंदाज संजू सॅमसन याची झाली.
बऱ्याच वेळा संधी नाकारलेल्या संजू याला या दौऱ्यात पुरेशी संधी मिळाली. मात्र, तो आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली.
संजू याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन वनडे सामन्यात संधी मिळाली. यामध्ये तो एका सामन्यात 9 तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करून बाद झाला. टी20 मालिकेतील तीन सामन्यात त्याला फलंदाजी करता आली. यामध्ये तो अनुक्रमे 7, 12 व 13 अशा धावा करू शकला. त्याच्या याच कामगिरीबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला,
“संजूने आतापर्यंत 22 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याने 18 च्या सरासरीने केवळ 333 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले असून नाबाद 77 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. टी20 आंतरराष्ट्रीय आकडे आयपीएलच्या आकड्यांसोबत जोडू नयेत. कारण, यामध्ये स्पष्टता दिसून येत नाही. सॅमसनने टी20 मध्ये प्रत्यक्षात कशी कामगिरी केली आहे याची कल्पना येण्यासाठी मी सॅमसनच्या आयपीएल आकडेवारीचा समावेश केलेला नाही. त्याची आकडेवारी आयपीएलमध्ये वाईट नाही. मात्र, टी20 मध्ये भारतीय संघात निवडण्याइतकी चांगली नाही.”
संजू आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये दिसून येतो. तो मागील तीन वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत असून संघ चांगली कामगिरी करत आहे.