नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असले तरी, कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत कांद्याच्या प्रश्नावर कसा तोडगा काढतात याकडेच बहुधा लक्ष असावे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच ती फडणवीसांनी जपानहून केल्यामुळे मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले.केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंडे कांदाप्रश्नी चर्चा करत होते. या चर्चेनंतर मुंडे व गोयल पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी जपानहून साडेदहा वाजता कांदा खरेदीच्या आणि दराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याची परस्पर घोषणा ट्वीटद्वारे केली. फडणवीस यांच्या सविस्तर ट्वीटनंतर मुंडे यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलण्याजोगे काही उरले नाही.
‘महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी जपानहून दूरध्वनीवरून संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल’, अशी सविस्तर माहिती देणारे ट्वीट फडणवीस यांनी केले.
मी तीन दिवसांमध्ये गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून १५ वेळा बोललो आहे. आत्ता दिल्लीत गोयल यांच्याशी चर्चा झाली असून कांद्याला ऐतिहासिक भाव मिळालेला आहे. यापूर्वी कधीही ‘नाफेड’ने प्रतिक्विंटल २,४१० रुपयांचा भाव देऊन कांद्याची खरेदी केलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे. – धनंजय मुंडे, कृषीमंत्री