शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या सध्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुंबई दौऱ्यावर आहेत. मुलुंडमध्ये काल महाप्रबोधन यात्रा पार पडली.
यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समाचार घेत त्यांच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मिमिक्री केली होती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून देखील त्यांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी केलेली आजवरची सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत. इतर पक्षांपेक्षा त्यांनी आंदोलनाच्या यशाचा रेट सर्वाधिक आहे, हे राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
‘ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे’, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना केलाय.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्र व्याजा सकट उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना दिला. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या?’, असा सवाल प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला.