देशाला वाचवायचं असेल तर भाजपला (BJP) पुन्हा बहुमताने सत्तेत आणावं लागेल असं अपर्णा यादव म्हणाल्या. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी रविवारी उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात हे विधान केलं.या कार्यक्रमात मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा, रायबरेली सदरमधून निवडणूक लढवलेल्या अदिती सिंह आणि प्रियांका मौर्य यांचं स्वागत करण्यात आलं. आपण राष्ट्रवादाच्या मुद्दयामुळे भारतीय जनता पक्षाची निवड केल्याचं अपर्णा यादव म्हणाल्या.
देशाला विकासाच्या वाटेवर वेगाने नेण्याबरोबरच देशातील संस्कृतीचं जतन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या संकल्पात योगदान देण्याचं काम आपल्याला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाच्या विचारांमुळेच आज मी या पक्षाचा भाग आहे. तसंच देशाला जर वाचवायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाला बहूमताने सत्तेत आणावं लागेल असंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, रायबरेली सदरमधून निवडणूक लढवलेल्या आदिती सिंह यांनी यावेळी सांगितलं की, भाजपने संपूर्ण कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये महिला केंद्रीत योजना राबवून महिलांच्या जीवनात नवीन रंग भरले आहेत. महिला केंद्रीत योजनांचा लाभ मिळाल्याने महिला सक्षम झाल्या आहेत. उज्ज्वला योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, कन्या सुमंगला योजना, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना, निराधार महिला पेन्शन योजना, बचत गट, राष्ट्रीय उपजीविका अभियान यासह अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून योगी सरकारने थेट महिलांना लाभ देण्याचं काम केलं आहे.