
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या जनधन (Jandhan) खात्याचा हेतुच मुळी हा होता की, शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि पैसे परस्पर त्यांच्या खात्यावर वर्ग व्हावे. परंतु महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात एक मजेशीर प्रकार उघडकीस आला.
एका शेतकऱ्याचा खात्यावर बँकेच्या चुकीने पंधरा लाख रुपये गेले आणि ते काढून त्याने त्याचा वापर करत घर बांधले.
ज्ञानेश्वर जनार्दन औटे नावाचा शेतकरी पैठण तालुक्यात दावरवाडी येथील रहिवासी आहे. बँक ऑफ बरोडा मध्ये त्याचे जन धन खाते असून १७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याच्या जनधन (Jandhan) खात्यात १५ लाख रुपये चुकीने वर्ग झाले. त्याला ही माहिती मिळाल्यावर त्याने अगोदर आश्चर्य व्यक्त केले पण नंतर त्याच्या लक्षात आले की, कोणत्यातरी शासकीय योजनेचे ते पैसे असावेत. नंतर त्याने आपल्या खात्यातून सर्व पैसे काढत घर बांधले. तसेच त्याला असेही वाटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत दिलेले १५ लाखाचे आश्वासन पूर्ण केले.
घटनेच्या पाच महिन्यानंतर शेतकरी ज्ञानेश्वर याला बँकेची नोटिस आली आणि सर्व प्रकार उघडकीस आला. आता बँकेने ते पैसे त्याच्या खात्यात चुकून गेले असून ते त्याला परत करावे लागतील असे सांगितले. व त्या प्रकारची नोटिस देखील पाठवली. मात्र आता शेतकरी सर्व पैसे खर्च करून बसला आहे आणि आता तो मोठ्या विवंचनेत सापडला आहे.